पुणे : सॅमसंग इंडिया आपल्या संशोधन आणि विकास केंद्रांसाठी २०१८मध्ये आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी सारख्या सर्वोत्तम महाविद्यालयातून एक हजार अभियंते निवडणार आहे. निवडलेल्या अभियंतांपैकी बहुतांश उमेदवार आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्झ (आयओटी), मशीन लर्निंग, बायोमेट्रिक, नॅच्युरल लॅंगवेज प्रोसेसिंग, ऑग्मेंटेड रियालिटी आणि फाइव्ह-जी सारखे नेटवर्क यांसारख्या आधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानावर काम करतील.
आयआयटी आणि एनआयटी व्यतिरिक्त दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, बिट्स पिलानी, मनिपाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी आणि आयआयआयटी या आणि इतर प्रमुख महाविद्यालयांतूनही ‘सॅमसंग’ गुणवंत आणि प्रतिभावंत उमेदवार निवडणार आहे. मागच्या वर्षी ‘सॅमसंग’ने आपल्या संशोधन आणि विकास केंद्रासाठी ८०० अभियंता निवडले होते आणि त्यापैकी ३०० उमेदवार आयआयटीमधील विद्यार्थी होते. यावर्षीही ‘सॅमसंग’ आयआयटीमधून ३०० अभियंता निवडून त्यांना विविध क्षेत्रात काम देणार आहे.
जगभरात ‘सॅमसंग’ची ३२, तर भारतात तीन संशोधन आणि विकास केंद्रे आणि दोन निर्मिती केंद्रे आहेत. संशोधन आणि विकास केंद्रे बेंगळुरू, नोयडा आणि दिल्ली इथे आहेत. दक्षिण कोरिया वगळता सॅमसंगचे सगळ्यात मोठे संशोधन आणि विकास केंद्र बेंगळुरुमध्ये आहे. भारतातील संशोधन आणि विकास केंद्रात जगभरातील उत्पादनांसाठी संशोधन केले जाते आणि त्याच बरोबर भारतातील स्थानिक बाजारासाठी पण विशिष्ट संशोधन केले जाते.
कंपनीच्या संशोधन केंद्रांमध्ये विकसित झालेल्या अनेक ‘मेड इन इंडिया’ कल्पना, जसे एस-बाइक मोड, अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोड, वॉशिंग मशीनसाठी अॅक्टिववॉश प्लस आदी आज भारतात आणि इतर काही विकसनशील देशात विकल्या जाणार्या सॅमसंग उत्पादनांचा एक भाग आहेत. यापैकी काही नवीन शोध ‘सॅमसंग’च्या जागतिक उत्पादनांचाही भाग झाले आहेत.
याबाबत सॅमसंग भारतीय आर अँड डी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि जागतिक वरिष्ठ उपाध्यक्ष दीपेश शाह म्हणाले, ‘भारतात होणार्या संशोधन आणि विकासाकडून ‘सॅमसंग’च्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे. आम्ही २२ वर्षांपासून भारतात आहोत. भारतातील तीन संशोधन आणि विकास केंद्रात अद्ययावत संशोधन केले जाते. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत, भारतातील संशोधन आणि विकास केंद्रात भारतीय ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून नवीन कल्पनांचा विचार केला जात आहे आणि त्याचा उपयोग जगभरातील सॅमसंग उत्पादनात पण केला जातो.’
ते पुढे म्हणाले, ‘यावर्षी सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयातून आमच्या तीन संशोधन आणि विकास केंद्रांसाठी आम्ही एक हजार अभियंता निवडणार आहोत, ज्यापैकी ३०० आयआयटी मधील असतील. बहुतांश अभियंता आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, सिग्नल प्रोसेसिंग, कम्प्युटर विझन, मोबाइल सुरक्षा, बायोमेट्रिक्स आदींसारख्या क्षेत्रात काम करतील. तिथे प्रतिभा आणि कौशल्याची खूप आवश्यकता आहे.’